‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?’खासदार डॉ. अमोल कोल्हे लोकसभेत गरजले

पुणे – केंद्र सरकार सातत्याने किसान सन्मान निधीचा उल्लेख करते परंतु किटकनाशके आणि खतांच्या किंमतीत ४ ते ५ पट वाढ झाली हे मात्र सांगितले नाही. टोमॅटोबाबत बोलताना अर्थमंत्र्यांनी हस्तक्षेपाचा उल्लेख केला, पण गेली ४-५ वर्ष दर मिळत नसल्याने शेतकरी टोमॅटो रस्त्यावर फेकत होता, तेव्हा हे सरकार शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला आलं नाही, अशी घणाघाती टीका करत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?’ असा जळजळीत सवाल केला.

लोकसभेत आज अविश्वास प्रस्तावावर बोलताना या सरकारवर कसा विश्वास ठेवायचा असा सवाल खासदार डॉ. कोल्हे यांनी केला. काल गृहमंत्र्यांनी आकडे कधी खोटं बोलत नाही असं म्हटलं, त्याचाच धागा पकडून खासदार डॉ. कोल्हे म्हणाले की, सरकार केवळ इकॉनॉमिकल ग्रोथचे आकडे फेकते, पण दरडोई उत्पन्नावर बोलत नाही. आकडे कधीच खोटं बोलत नाहीत. त्यामुळे अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर पोहोचते असं म्हणता तेव्हा दरडोई उत्पन्नामध्ये जगात आपण १४१ क्रमांकावर आहोत, या वास्तवाकडे अंगुलीनिर्देश करीत खासदार डॉ. कोल्हे म्हणाले की, यांचा अर्थ देशाची संपत्ती काही मोजक्या धनदांडग्याच्या हातात एकवटत आहे.

सरकारची कार्यपद्धती पाहिली की, गांधीजींच्या तीन माकडांची आठवण होते असं सांगत सरकारच्या विरोधात काही ऐकू नका, निवडणुका वगळता देशाच्या परिस्थिती बघू नका आणि विरोधी पक्षनेत्यांची तोंड बंद करा ही सरकारची नीती असल्याची जळजळीत टीका केली. पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी जुन्नरच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांने चिठ्ठी लिहून केलेल्या आत्महत्येचा उल्लेख करीत खासदार डॉ. कोल्हे यांनी याला सरकारचे कांद्याबाबतचे चुकीचे निर्यात धोरण कारणीभूत असल्याचे प्रतिपादन केले.

खासदार डॉ. कोल्हे भाषणाचा समारोप करताना पंतप्रधानांना नुकत्याच मिळालेल्या लोकमान्य टिळक पुरस्काराचा संदर्भ देत ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?’ असा जळजळीत सवाल केला.